मनगणे


लहानपणी मला हा पदार्थ खूप आवडायचा, इतका की आई दर शनिवारी दुपारच्या जेवणात बनवायची आणि मी त्याची वाट बघायचे. आईची हि पाककृती मी थोडीशी बदलून वापरली आहे.

मनगणे
साहित्य
१ वाटी हरबरा डाळ
३/४ वाटी गुळ
१/२ वाटी काजू
१/२ वाटी मनुका
३ वाटी दुध
चिमुटभर वेलची पूड
मीठ

कृती
  • हरबरा डाळ १.५ वाटी पाणी घालुन ४-५ शिट्ट्या येईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • त्यात गुळ, काजू, मनुका, वेलची पूड आणि मीठ घालुन मध्यम आचेवर ५ मिनिट उकळवणे व नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणे.
  • त्यात दुध घालुन वाढणे.

टीप
सगळ्यात सोप्पी डीश आहे नाही :) चव गुळ, डाळ आणि सुक्यामेव्यानी येते.
नेहमीच्या दुधाऎवजी नारळाचे दुध वापरता येईल पण आई दुध वापरते म्हणून मी पण तेच वापरले.

पनीर बिर्यानी


मागच्या आठवड्यात मी हि बियाणी बनवलेली. बऱ्याच दिवसांपूर्वी अनुजानी मला व्हेज बिर्यानी बनव असे सांगितलेले आणि मला असेही आठवतेय की तिला पनीर नव्हत वापरायच. पण मी हि पनीरची बिर्यानी बनवून तिची अर्धी इच्चा पूर्ण केलीये म्हणायला हरकत नाहीये.बनवायला एकदम सोप्पी आणि चविष्ठ. ह्याची कृती मी माझ्या ह्या मसालेदार बिर्याणीच्या कृतीवरून प्रेरित होऊन बनवलीये.

पनीर बिर्यानी
साहित्य
३ वाटी तांदूळ
४०० ग्राम पनीर
४ टोमाटो
३ कांदे
२ बटाटे
१ वाटी काजू
१/२ वाटी बदाम
८ दालचिनी
१५ लवंग
१५ वेलची
१/२ चमचा खसखस
१/२ चमचा मिरे
१ चमचा जिरे
१/२ चमचा बडीशेप
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ वाटी दही
१/२ वाटी दुध
२ चिमुट केशर
८ चमचे तूप
४ चमचा लोणी
मीठ
तेल

कृती
  • एका भांड्यात हळद, तिखट, आले पेस्ट, लसूण पेस्ट, दही आणि मीठ एकत्र करणे व त्यात पनीरचे तुकडे करून घालणे. एक दोन तास बाजूला ठेवून देणे.
  • भात कोमट पाण्यात भिजवून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात लोणी घालणे. पनीरचे तुकडे हलक्या गुलाबी रंग्वर भाजून घेणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच कढईत ४ दालचिनी, ५ लवंग, मिरे, खसखस, बडीशेप, धने पूड, बदाम आणि १/२ वाटी काजू घालुन मंद आचेवर खमंग भाजून घेणे.
  • त्यात एक कांदा बारीक चिरून घालणे व गुलाबी होईपर्यंत भाजणे. मिश्रण थंड करणे व मिक्सर मध्ये एका टोमाटोबरोबर वाटणे.
  • कढईत २ चमचे तूप टाकून गरम करणे व त्यात हा मसाला घालुन भाजणे.
  • उरलेले ३ टोमाटो मिक्सर मध्ये वाटून घेणे व ते आणि मीठ मसाल्यात घालुन भाजी सुकेपर्यंत शिजवणे.
  • त्यात पनीरचे तुकडे घालुन ढवळणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरमध्ये बटाटे उकातून त्याच्या साली काढून चकत्या करून घेणे.
  • दुध गरम करून त्यात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • भांड्यात पाणी गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालुन शिजवणे. थोडेशे कच्चे राहिल्यावर त्यातील पाणी काढून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • छोट्या कढईत ४ चमचे तूप गरम करून त्यात ४ दालचिनी, १० लवंग, १५ वेलची घालणे. हे मिश्रण आणि मीठ भातात मिसळणे व बाजूला ठेवणे.
  • उरलेले २ कांदे बारीक उभे चिरून तेलात मध्यम आचेवर गुलाबी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणे.
  • त्याच तेला उरलेले १/२ वाटी काजू तळून घेणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
  • भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे पनीरचे मिश्रण पसरणे.
  • पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले पनीर पसरवणे
  • वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
  • परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे व त्यावर केशर दुध ओतणे.
  • मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व २५-३० मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.

टीप
मी १ थर भात, अर्धे पनीर मिश्रण आणि मग अजून एक थर भात (२ वाटी तांदुळाचा) वापरला. अर्धेच काजू आणि कांदा पण वापरले. उरलेला पनीर मसाला मी डब्यात घालुन पुढच्या आठवड्यात करण्यासाठी बाजूला ठेवून दिला. नंतर मला फक्त भात बनवावा आणि थोडा कांदा तळवा लागला. काम करून आल्यावर थकलेल्या दिवशी एकदम पटकन आणि चाविस्थ बिर्यानी खाता आली.
मी नेहमीच बिर्याणीच्या खाली बटाट्याचा थर देते त्यामुळे बिर्याणी करपट नाही.
मी पनीर आणि दह्याचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेले त्यामुळे पनीर चांगले राहते आणि मिश्रण थोडे सुकते सुद्धा.

तंदुरी पनीर पिझ्झा


माझा आवडता पिझ्झा :) इथे एका ठिकाणी मिळतो पण मला त्यांची चव नाही आवडत. त्यामुळे मी हा पिझ्झा बनवण्याचा बरेच दिवस विचार करत होते आज शेवटी बनवलाच.

तंदुरी पनीर पिझ्झा
साहित्य
४ वाटी गव्हाचे पीठ
२ वाटी मैदा
४०० ग्राम पनीर
२.५ वाटी मोझारेल्ला चीज
१ वाटी पार्मेसान चीज
१.५ वाटी दुध
५ चमचा दही
२.२५ चमचा यीस्ट
१/२ कांदा
१/४ वाटी सुकवलेले टोमाटो
४ ढोबळ्या मिरच्या
१/४ वाटी ओलिव्ह तेल
२ चमचा लोणी
१/२ चमचा साखर
२ चमचे तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
२ चमचा तंदुरी मसाला
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ चमचा बेसिल पाने
मीठ

कृती
  • एक वाटी कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट घालुन ढवळणे. भांड्याला प्लास्टिकचे झाकण लावून १० मिनिट बाजूला ठेवणे.
  • परातीत गव्हाचे पीठ, मैदा, ओलिव्ह तेल, वितळवलेले लोणी, यीस्टचे पाणी आणि मीठ एकत्र करणे.
  • दुध घालुन मऊसर पीठ मळणे. मोठ्या भांड्यात तेलाचा हात लावून व झाकण लावून २ तास ठेवून देणे.
  • एका भांड्यात दही, आले पेस्ट, लसूण पेस्ट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, तंदुरी मसाला आणि मीठ एकत्र करणे.
  • पनीरचे तुकडे मिश्रणात घालुन चांगले ढवळणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
  • पीठ दुप्पट झाल्यावर त्याचे दोन भाग करून दोन तव्यांवर पसरवणे.
  • त्यावर पार्मेसान चीज, मोझारेल्ला चीज पसरवणे.
  • पनीर चे तुकडे, ढोबळी मिरची, कांदा, सुकलेला टोमाटो, बेसिल पाने पण पसरवणे.
  • ओव्हन ४००F/२००C वर गरम करून त्यात २५ मिनिट पिझ्झा भाजणे.

टीप
यीस्ट वापरताना पाणी कोमट असले पाहिजे, जास्त गरम पाण्यामुळे यीस्ट जळण्याची शक्यता असते आणि पाणी थंड असेल टर यीस्ट नीट फुलणार नाही. सगळे बरोबर झाले टर यीस्टच्या पाण्यात १० मिनिटांनी बुडबुडे आले असतात.
माझा एक पिझ्झा बरोबर झाला आणि दुसरा चांगला फुलाला नाही. थोडे शोधल्यावर कळले की ओव्हनच्या सगळ्यात वरच्या रकान्यात पिझ्झा बनवायला पाहिजे. मध्ये चांगला गरम न झाल्यानी पिझ्झा फुगत नाही.

तिरंगी भात


बरेच दिवस झाले नवीन पोस्ट करून. थोडा स्वयंपाकापासून आराम करत होते. भारतात असताना महिन्यातून एकदा पुण्याला गेल्यावर थोडी विश्रांती व्हायची पण इथे आल्यापासून मला ते सुख नाहीये. इथे आल्यापासून विश्रांती म्हणजे मग फास्टफूड खाऊन आराम करावा लागतो. पण आता मला एकदम ताजे तवाने वाटतेय. हि पाककृती मी अशीच चालू केलेली आणि मनात आले तसे जिन्नस घालत गेले.

तिरंगी भात
साहित्य
९ वाटी भात
२ टोमाटो
मुठभर कोथिंबीर
३ मुठ पालक
१ हिरवी मिरची
१ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
भाजलेले काजू
तूप
मीठ

कृती
  • भातात मीठ घालुन त्याचे ३ भाग करणे.
  • मिक्सरमध्ये टोमाटो वाटून घेणे.
  • पालक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेणे.
  • पालक-कोथिंबीर मिश्रण उकळवणे आणि आटल्यावर त्यात एक भाग भात आणि धने पूड घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
  • दुसऱ्या भाताच्या भागात दोन चमचे तूप घालुन एकत्र करणे.
  • टोमाटो मिश्रण पण उकळवणे. त्यात तिखट, गरम मसाला आणि उरलेला एक भाग भात घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
  • सगळे भाताचे भाग ताटलीत पसरवणे व काजू घालुन वाढणे.

टीप
पालक वाटताना मी एकदम थोडे पाणी घालुन १/३ भाग पालक पहिल्यांदा वाटला. मग त्यात अजून थोडा पालक घालुन वाटला असे करत वाटल्यानी पाणी कमी लागते आणि वाटण पातळ नाही होत.
भात बनवताना मी भात शिजल्यावर त्यातले उरलेले पाणी ओतून दिले आणि थंड पाण्याखाली धुतला त्यामुळे सगळे दाणे एकदम वेगवेगळे झाले.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP